

सांगली वृत्तसेवा – चांदोली धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील शेतीकामांना वेग आला असून, शेतकरी भातलावणीच्या कामात पूर्ण जोमाने व्यस्त आहेत. पावसाच्या संततधारेतही महिला व पुरुष शेतकरी चिखलाने भरलेल्या शेतात दिवसभर राबताना दिसत आहेत.
भातशेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साहाय्याने चिखलगुट्टा करून रोपलावणी केली जात आहे. वेळेत लागवड पूर्ण झाल्यास यंदा भाताचे चांगले उत्पादन मिळेल, या आशेने शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतही शेतीची कामे सुरू ठेवत आहेत.
सध्या चांदोली धरण परिसरात हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर आणि पाण्याने भरलेली भातशेते असे निसर्गरम्य चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची शेतीसाठीची धडपड, ग्रामीण जीवनाचे वास्तव अधोरेखित करत आहे.
यंदा मान्सूनने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी खरीप हंगाम भरघोस होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पावसाशी दोन हात करत शेतीशी असलेली आपली नाळ जपणारा बळीराजा पुन्हा एकदा कष्टाची परंपरा कायम ठेवताना दिसत आहे.












