रायबाग प्रतिनिधी संभाजी चव्हाण : माजी मुख्यमंत्री तथा सामाजिक क्रांतीचे प्रणेते डी. देवराज आरसू यांचे आदर्श जीवन आणि तात्त्विक विचार आजच्या तरुणांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन तहसीलदार महादेव सनमुरी यांनी केले.
गुरुवारी रायबाग तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात तालुका प्रशासन आणि मागासवर्गीय कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डी. देवराज आरसू यांच्या १११ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना तहसीलदार सनमुरी यांनी आरसू यांच्या कार्याचा गौरव केला.
डी. देवराज आरसू यांचा कार्यकाळ कार्यक्षम आणि प्रभावी होता. प्रामाणिकपणे काम करणारे तसेच विकासाचे अनेक प्रकल्प राबविणारे ते तगडे आणि दूरदृष्टीचे नेते होते, असे सनमुरी यांनी सांगितले.
यावेळी व्याख्याते शिक्षक शिवानंद हुलगबली म्हणाले की, मुत्सद्दी नेते डी. देवराज आरसू यांचा काळ हा सुवर्णकाळ होता. त्यांनी समाजातील अनेक वाईट प्रथा मोडून काढत शेतकरी, दलित आणि मागासलेल्या समाजघटकांच्या उन्नतीसाठी विविध लोकाभिमुख योजना आखल्या व त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली.
जमीन सुधारणा कायद्यामुळे ‘नांगरणारा हाच जमिनीचा मालक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली. त्यामुळे शोषित आणि वंचित घटकांसाठी आरसू हे आशास्थान ठरले. त्यांचे आदर्श जीवन आणि सामाजिक कार्य आजच्या राजकीय नेत्यांसाठीही मार्गदर्शक असल्याचे हुलगबली यांनी सांगितले.
कार्यक्रमास तालुका प्रशासनातील अधिकारी, मागासवर्गीय कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.











