
संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी
चंदगड : ईनाम सावर्डे (ता. चंदगड) येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी चंदगड तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या नागरिकांशी आमदार शिवाजीराव पाटील यांनी संवाद साधत त्यांच्या वैयक्तिक तसेच गावपातळीवरील विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेतले.
नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांपैकी काही समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रलंबित प्रश्नांचा शासन व प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली.
यानंतर चंदगड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, प्रत्येक बूथ सक्षम करणे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच गावागावातील जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
“बूथ हा संघटनेचा पाया, तर कार्यकर्ता ही संघटनेची खरी ताकद आहे,” असे सांगून प्रत्येक पदाधिकारी व बूथप्रमुखाने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
जनसेवा हेच राजकारणाचे प्रमुख ध्येय असून चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि मजबूत पक्ष संघटना या त्रिसूत्रीवर आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
“जनतेचा विश्वास हीच ताकद, कार्यकर्त्यांची साथ हीच ऊर्जा आणि चंदगडचा सर्वांगीण विकास हेच ध्येय,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











