
ईश्वरपूर / प्रतिनिधी :
खरीप हंगामातील पिकांना युरिया खताची गरज असताना ईश्वरपूर शहरासह वाळवा तालुक्यातील अनेक भागांत युरियाचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू आहे. अनेक कृषी सेवा केंद्रांवर युरिया उपलब्ध नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत असून, युरिया घेण्यासाठी अन्य मिश्र खते घेण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी केला आहे.
सध्या भातासह खरीप पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर युरियाची आवश्यकता आहे. मात्र, काही ठिकाणी ‘युरिया शिल्लक नाही’, असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जात आहे. तर काही ठिकाणी युरिया हवा असल्यास अन्य मिश्र खतांची गोणी घेण्याचा आग्रह केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘२६५ रुपयांचा युरिया हवा असेल तर दोन हजार रुपये किमतीची अन्य खताची गोणी घ्या’, असा प्रकार काही ठिकाणी सुरू आहे . अशा सक्तीच्या जोडखत विक्रीमुळे शेतकऱ्यांवर अनावश्यक आर्थिक भार पडत आहे. वेळेत युरिया उपलब्ध न झाल्यास पिकांच्या वाढीवर आणि परिणामी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी भागवत जाधव यांनी केली आहे.
युरियाच्या उपलब्धतेबाबत माहिती घेण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हा विषय पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे असल्याचे सांगितले जाते. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यास हा विषय कृषी विभागाकडे असल्याचे सांगून एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोपही जाधव यांनी केला.
कृषी विभागाने खुर्चीत बसून परिस्थिती पाहण्याऐवजी प्रत्यक्ष बाजारपेठेत उतरून खत विक्री केंद्रांची तपासणी करावी. जिल्ह्यात भरारी पथके नेमून युरियाचा साठा, विक्रीचे दर आणि सक्तीची जोडखत विक्री यांची तपासणी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
युरियाचा साठा असूनही शेतकऱ्यांना खत दिले जात नसेल, जादा दर आकारला जात असेल किंवा अन्य खतांची सक्ती केली जात असेल तर संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी. प्रत्येक कृषी केंद्रावरील उपलब्ध खतसाठ्याची माहिती सार्वजनिक करून शासनाने निश्चित केलेल्या दरात युरियाचा नियमित पुरवठा करावा, अशी मागणी भागवत जाधव यांनी केली.
‘युरिया मिळाला नाही तर कृषी अधिकारी कार्यालयात खत विस्कटणार’
युरियाचा तुटवडा तातडीने दूर न केल्यास कृषी अधिकारी कार्यालयात युरियाच्या खताच्या गोण्या विस्कटून आंदोलन करण्याचा इशारा भागवत जाधव यांनी दिला आहे.











