Edition

18 घरकुलांवरून गेलेल्या 11 के.व्ही. विद्युत तारेमुळे जीवितास धोका; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव, वाशिम : रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथे शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत सुमारे 25 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या 18 घरकुलांवरून 11 के.व्ही.ची उच्चदाब विद्युत वाहिनी गेल्याने येथील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना कायम भीतीच्या वातावरणात जीवन जगावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही विद्युत वाहिनी अनेक वर्षांपूर्वीची असून तिच्या तारा झिजून बारीक झाल्या आहेत. तसेच विद्युत तारेचे फिटिंग व इतर साहित्यही जीर्ण झाल्यामुळे कधीही तार तुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यापूर्वीही घराजवळ विद्युत तार तुटून पडल्याची घटना घडली होती. मात्र, सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
या गंभीर समस्येबाबत 2015 पासून आजपर्यंत संबंधित महावितरण कार्यालयाकडे 11 के.व्ही. विद्युत वाहिनीचे तातडीने स्थलांतर करण्यासाठी अनेक वेळा लेखी तक्रारी व निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासन व महावितरणकडे तातडीने या विद्युत वाहिनीचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून संभाव्य दुर्घटना टाळण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात विद्युत तार तुटून जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्यास संबंधित विद्युत विभाग व जबाबदार अधिकारी-कर्मचारी हेच पूर्णपणे जबाबदार राहतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!