शिराळा प्रतिनिधी – वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात पात्राबाहेर पडून नदीकाठावरील शेतीमध्ये शिरले आहे. मात्र, पुराच्या पाण्यासोबतच मगरीही शेती परिसरात दिसून येत असल्याने ऐतवडे खुर्द, चिकुर्डे व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चार दिवसांपासून वारणा नदीचे पुराचे पाणी ऐतवडे खुर्द–चिकुर्डे मार्गालगतच्या शेतामध्ये साचले आहे. त्यामुळे भातासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुभत्या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या काही शेतकऱ्यांना भल्यामोठ्या मगरी दिसून आल्या. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सध्या परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने वारणा नदीची पाणीपातळी वाढलेली असून नदीचे पाणी अजूनही पात्राबाहेर आहे. परिणामी मगरी नदीतून बाहेर येऊन शेती पिकांमध्ये व पाणथळ भागात दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतात जाताना विशेष सावधगिरी बाळगावी, एकटे जाणे टाळावे तसेच मगरी आढळल्यास तत्काळ वन विभाग किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.











