
सांगली प्रतिनिधी – प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून वाळवा तालुक्यात हरकती दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल १,२७६ हरकती प्रांत अधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आल्या. मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहून आपल्या लेखी हरकती प्रशासनाकडे सादर केल्या.
महामार्गामुळे तालुक्यातील सुपीक बागायती जमीन, ऊस शेती, पाणीपुरवठा संस्था, विहिरी, बोअरवेल तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या वाळवा तालुक्यात या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता असून स्थानिक अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होईल, असे हरकतींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या हरकतींमधून प्रस्तावित मार्गाचा फेरविचार करून सुपीक शेती व ग्रामीण जीवनावर परिणाम होणार नाही असा पर्यायी मार्ग निश्चित करण्याची मागणी केली आहे. हरकती दाखल करण्यासाठी विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने प्रशासनालाही अतिरिक्त व्यवस्था करावी लागली.
पहिल्याच दिवशी १,२७६ हरकती दाखल झाल्याने शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला वाळवा तालुक्यात मोठे बळ मिळाले असून आगामी काळात हरकतींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












