शिराळा प्रतिनिधी – शिराळा तालुक्यात अलीकडे घडलेल्या काही दुःखद आणि तणावपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्यासाठी रविवार, २१ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजता शिराळ्यातील अंबामाता मंदिर येथे ‘सलोखा बैठक’ आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीचे अस्थायी निमंत्रक डॉ. भारत पाटणकर आणि कॉ. धनाजी गुरव यांनी प्रसिद्ध केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, काही हिंसक घटनांमुळे आणि समाजमन कलुषित करणाऱ्या वक्तव्यांमुळे तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि समाजात परस्पर विश्वास व बंधुभाव टिकून राहावा, यासाठी व्यापक विचारविनिमयाची आवश्यकता आहे.
आवाहनात शिराळा तालुक्याच्या ऐतिहासिक वारशाचाही उल्लेख करण्यात आला आहे. स्वातंत्र्यलढ्यात ‘प्रतिसरकार’ उभारून सर्व जाती-धर्मातील तरुणांनी एकत्र येत इंग्रजांविरोधात लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवण्यात मोलाचे योगदान दिल्याची आठवण करून देण्यात आली आहे. समांतर सरकार, न्यायदान मंडळे आणि सेवादलाच्या माध्यमातून लोकशाही व सामाजिक ऐक्याचा आदर्श शिराळ्याने घालून दिला होता, असेही नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच शिराळा-वाळवा मतदारसंघातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या ‘सलोखा बैठकीत’ सहभागी होऊन सामाजिक ऐक्य मजबूत करण्यासाठी आपले विचार मांडावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












1 thought on “शिराळ्यात २१ जून रोजी ‘सलोखा बैठक’; सामाजिक ऐक्य आणि शांततेसाठी मान्यवरांचे आवाहन..”
xnkn2f