धैर्यशील कदम, अभय जगताप आणि किशोर धुमाळ रिंगणात
सातारा–सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील एकूण ८९५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप आणि अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांच्यात चुरशीची लढत होत आहे. त्यामुळे अंतिम निकालाबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि संघर्ष चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात हे मतभेद दूर झाल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या सदस्यांनी भाजप समर्थित उमेदवार धैर्यशील कदम यांना पाठिंबा दिल्याने महायुतीचे पारडे जड मानले जात आहे.
आज दिवसभर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागणार असून, सातारा–सांगली विधान परिषदेची ही प्रतिष्ठेची जागा कोणाच्या झोळीत पडणार याचा निर्णय लवकरच स्पष्ट होणार आहे.











