सांगली प्रतिनिधी – परवा सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यातील ऊस व भाजीपाला शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस, सुसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने ऊस पिके अक्षरशः भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावर्षी कडक उन्हाळा असल्याने बळीराजांनी कसेबसे ऊस पिकाचे संगोपन केले होते. मात्र परवा सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने या परिसराला झोडपून काढले. यामुळे डोलदार उभी असलेली ऊस पिके जमीनदोस्त झाली. भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे की, एवढे मोठे नुकसान होऊनही कृषी विभाग निद्रा अवस्थेत आहे. अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने नुकसानीची पाहणी केलेली नाही. पंचनामे करण्यासही सुरुवात झालेली नाही.
तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वारणा पट्ट्यातील बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.









