विशाल क्रांती वृत्तसेवा सांगली – इटकरे (ता. वाळवा) येथे शक्तीपीठ महामार्गाविरोधात इटकरे व परिसरातील शेतकऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाला आणि मोजणीला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाने बळजबरी केल्यास ‘जेल भरो’ आंदोलन उभे करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
या बैठकीत बोलताना शेतकरी नेते कॉम्रेड धनाजी गुरव यांनी शेतकऱ्यांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “हा आपल्या अस्तित्वाचा शेवटचा लढा आहे. जमीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने मैदानात उतरले पाहिजे. वेळप्रसंगी आपल्याला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल, आपण ‘जेल भरो’ आंदोलन उभे करू. जर पहिली फळी जेलमध्ये गेली, तर दुसऱ्या फळीतील शेतकऱ्यांनी शेतात ठामपणे उभे राहून मोजणीला विरोध केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या या अभेद्य एकजुटीमुळे शासनाला अखेर माघार घ्यावीच लागेल.”
कामेरीचे सरपंच रणजित पाटील, अनिल पाटील, बी. जी. पाटील, शामराव पाटील, इटकरेचे सरपंच संपत कांबळे, गुंडा नाना यांनीही आपल्या भाषणांतून प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडक शब्दांत टीका केली. कोणत्याही परिस्थितीत जमिनी न देण्याचा निर्धार व्यक्त केला. नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, दिनकर पाटील, जयसिंग पाटील, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










