सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बातमी आहे. चांदोली-वारणा धरण आज, 29 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता 100 टक्के भरले. सकाळी 99.86 टक्के असलेले धरण अवघ्या काही तासांत पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
धरणाची जलपातळी 626.90 मीटर झाली असून एकूण पाणीसाठा 34.40 टीएमसी (974.19 दलघमी), तर उपयुक्त पाणीसाठा 27.52 टीएमसी (779.35 दलघमी) झाला आहे.
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात 1.54 टीएमसी अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. धरण परिसरात आज 10 मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 2096 मिमी पाऊस झाला आहे.
सध्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झालेला नसून विद्युतगृहातून 1600 क्युसेक पाणी वारणा नदीत सोडले जात आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याची आवक वाढल्यास सांडव्यावरून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.
धरण शंभर टक्के भरल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात मिटली असून आगामी काळासाठी जलसाठ्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे.











