
शिराळा प्रतिनिधी – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मंजूर झालेल्या शिराळा उपसा सिंचन योजनेमुळे तालुक्याच्या उत्तर विभागातील कोंडाईवाडी, धामवडे, शिरशी, गिरजवडे व घागरेवाडी या गावांतील सिंचनापासून वंचित राहिलेल्या शेती क्षेत्राला मोठा लाभ मिळणार आहे. जलसिंचन ही या भागातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची गरज असून, शेतीला पाणी मिळाल्यास उत्पादन वाढीसह शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होईल, अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली.
आमदार देशमुख यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संबंधित गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना योजनेची माहिती दिली. यावेळी नियोजित आराखडा मांडून पाणी वितरणाची कार्यपद्धतीही समजावून सांगण्यात आली.
“उत्तर विभागातील अनेक गावांमध्ये सुपीक जमीन असूनही सिंचनाच्या पाण्याअभावी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन घेता येत नाही.
त्यामुळे या भागातील जास्तीत जास्त शेती क्षेत्र ओलीताखाली आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला या योजनेमुळे मूर्त स्वरूप मिळत असून, योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला सिंचनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे आमदार देशमुख यांनी सांगितले.
या योजनेत सोनवडे, चरण, बिळाशी व कणदूर असे चार स्क्रीम प्रस्तावित आहेत. उत्तर विभागातील वंचित पाच गावांना पाणी देण्यासाठी चरण येथून पाणी उचलून गवळेवाडीपर्यंत पाणी नेण्यात येणार आहे.पंप हाऊस मधून हे पाणी सुमारे १८० मीटर उंचीवर उचलून संबंधित गावांतील वंचित क्षेत्राला सिंचनाचा लाभ दिला जाणार आहे.
कोंडाईवाडी, धामवडे, शिरशी, गिरजवडे व घागरेवाडी या गावांतील सिंचनापासून वंचित क्षेत्राचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील अनेक वर्षांपासूनची सिंचनाची मागणी पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, तानाजी कुंभार, शिरशी सरपंच स्मिताताई भोसले,कोंडाईवाडी सरपंच अशोक सावत,हरेश चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, नितीश पोतदार, कार्यकारी अभियंता, ए. एन. मोरे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी), हरेश पाटील, शेखर भोसले, संजय महिंद, आनंदा महिंद,डी. एन. चव्हाण, कार्यकारी अभियंता (विद्युत), अक्षयकुमार खराडे व विजय आंबोळे, उपअभियंता तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.











