इचलकरंजी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने १३ जुलै २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे पहिली ते आठवीसह विविध शैक्षणिक सहाय्य योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे सर्व शैक्षणिक सहाय्य योजना सुरू कराव्यात, या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत होत्या. मात्र शैक्षणिक सहाय्य योजनांमध्ये पहिली ते आठवी, दहावीत ५० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचे अनुदान, पदवी (प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष) तसेच डिप्लोमा अभ्यासक्रमासाठीचे शैक्षणिक सहाय्य बंद करण्यात आले आहे. या सर्व योजना पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय नवीन नोंदणी व नूतनीकरणासाठीचा कोटा वाढविण्यात यावा, तसेच जिल्हा सुविधा केंद्रामार्फत आधार क्रमांक व नावाच्या स्पेलिंगमधील दुरुस्तीची सुविधा गेल्या दोन वर्षांपासून बंद असून ती पुन्हा तालुका व जिल्हा सुविधा केंद्रांमार्फत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठ स्तरावर पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या आंदोलनात आनंदा गुरव, राजेंद्र निकम, मदन मुरगुडे, रजनीकांत माने, बंडोपंत सातपुते, सचिन साठे, सुनील बारवाडे, दीपक रेपाळ, अमित वडर, शंकर नंदरगी, सचिन बिरांजे, परसराम कत्ती, सदाशिव यादव, रमेश खोत, पोपट दिंडे यांच्यासह अनेक बांधकाम कामगार उपस्थित होते.











