सांगली प्रतिनिधी – सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेत घट झाली असून वारणा नदीची पाणीपातळीही हळूहळू कमी होऊ लागली आहे.
सध्या चांदोली धरण 58.66 टक्के भरले असून धरणात 20.18 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे धरणात सध्या 7,650 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.
पर्जन्यमापक नोंदीनुसार आज सकाळी सहा वाजेपर्यंत चांदोली धरण परिसरात 8 मिलिमीटर, तर पाथरपुंज येथे 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे वारणा नदीने धोक्याची पातळी गाठली होती. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने नदीची पाणीपातळी आता घटू लागली असून नदीकाठच्या परिसरातील पूरस्थिती हळूहळू निवळण्यास मदत होत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील पावसाच्या अंदाजानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.











