रायबाग, प्रतिनिधी : देशातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे तसेच जिल्हाभरात शैक्षणिक संस्था उभारून गरीब विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे शिक्षणप्रेमी स्व. वसंतराव पाटील (आभाजी) यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार कौलागुड्ड व हणमापूर येथील सिद्धसिरी सिद्धाश्रमाचे प.पू. अमरेश्वर महाराज यांनी काढले.
रायबाग डिप्लोमा टेक्निकल कॉलेजमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या प्रथम वर्ष डिप्लोमा विद्यार्थ्यांच्या स्वागत व शिकवणी वर्गाच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी अमरेश्वर महाराज म्हणाले, “शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसावे. विद्यार्थ्यांनी पालकांचा आदर, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचेही शिक्षण घ्यावे. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासह चांगल्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देणे ही संस्थेच्या व्यवस्थापनाची मोठी जबाबदारी आहे.”
कार्यक्रमात आरएसएसएल रायबाग युनिटचे महाव्यवस्थापक संगमनाथ जमादार यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “डिप्लोमा विद्यार्थ्यांना कारखान्यात प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. विविध नामांकित कंपन्यांना महाविद्यालयात बोलावून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. व्यावसायिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते.”
यावेळी आरएसएसएल रायबाग युनिटचे मानव संसाधन अधिकारी संजय किल्लेदार, वरिष्ठ ऊस व्यवस्थापक विरुपाक्ष कारलिंगन्नावर, अध्यक्ष भरतेश दड्डी, मल्लिकार्जुन जेदार, सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयातील व्याख्याते, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या व्याख्यात्यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत ओडेर यांनी केले, तर आदित्य बेळगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.











