सांगली प्रतिनिधी – चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या वारणा नदीची पाणीपातळी आता काहीशी कमी झाली असून वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पुलावरील पाणी पूर्णपणे ओसरले आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने पुलावरून वेगाने पाणी वाहत होते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक तातडीने बंद केली होती. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता.
दरम्यान, नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर पुलावरील पाणी ओसरल्याने प्रशासनाने पाहणी करून वाहतुकीस परवानगी दिली आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
तथापि, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाची शक्यता कायम असल्याने वारणा नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पुराच्या पाण्यात उतरण्याचा अथवा धोका पत्करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











