
शिराळा प्रतिनिधी :
सन – २०२४ मध्ये झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळदार पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त झाले. अनेकांचे घराचे पत्रे उडाली, कुणाच्या घरांच्या भिंती कोसळल्या, तर अनेकांचे आयुष्य अक्षरशः उघड्यावर आले. नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या ७९४ कुटुंबांना सरकारकडून मदत मिळण्यासाठी तब्बल दोन वर्षे वाट पाहावी लागली. अखेर शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी विधानसभेत या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर सरकारने गुरुवारी दिनांक 2 जुलै रोजी ३२ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा निधी मंजूर केला.
१ एप्रिल ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील मिरज, तासगाव, आटपाडी, कवठे महांकाळ, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर आणि जत तालुक्यांमध्ये वादळी पावसाने मोठे नुकसान केले होते. प्रशासनाने पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला; मात्र मदतीचा प्रस्ताव शासकीय लालफितीत अडकून पडल्याने आपत्तीग्रस्तांना दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. आमदार सत्यजित देशमुख यांनी विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अखेर निधी मंजूर केला. त्यामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या ७९४ कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, २०२५ आणि २०२६ मधील आपत्तीग्रस्तांना भरपाई मिळाली होती; परंतु २०२४ मधील लाभार्थी वंचित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. आता हा निधी मिळाल्याने दोन वर्षांपासून शासनाच्या दारात हेलपाटे मारणाऱ्या कुटुंबांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
चौकट:-
लाभार्थ्यांकडून सत्यजित देशमुख यांचे आभार….
नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या ७९४ कुटुंबांच्या मदतीचा प्रस्ताव दोन वर्षे प्रलंबित राहिल्याने लाभार्थींना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला.आमदार सत्यजित देशमुख यांनी विधानसभेत ठामपणे आवाज उठवत निधी मंजूर करून घेतला. याबद्दल लाभार्थ्यांच्या वतीने आमदार देशमुख यांचे आभार मानले.
चौकट
असा मिळाला नुकसानभरपाईचा निधी
नुकसानीचा प्रकार / कुटुंबे / अनुदान (रुपयात)
पक्की घरे : ६७ / ४, ३५, ५००
कच्ची घरे : ६०५ / २४, २०, ०००
पशुधन गोठे : १२० / ३, ६०, ०००
झोपड्या : २ / १६, ०००
एकूण : ७९४ / ३२, ३१, ५००
चौकट
शासनाने २०२४ मधील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी ३२ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून तसे पत्रही मिळाले आहे. तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहे.
<span;><span;>- डॉ. स्नेहल कनिचे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली
.











