उरुण ईश्वरपूर, ता. वाळवा : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला उरुण ईश्वरपूर परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवित मंगळवारी (दि. ३० जून) महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५ च्या कलम १५(२) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे २५१ हरकती दाखल केल्या.
महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे सुपीक शेती, बागायती क्षेत्र तसेच शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. त्यामुळे प्रकल्पाचा फेरविचार करून शेतकऱ्यांवरील अन्याय टाळावा, अशी मागणी हरकतींद्वारे करण्यात आली.
हरकती दाखल करण्याच्या वेळी विश्वासराव पाटील (नाना), प्रा. अनिल पाटील (सर), शैलेश पाटील (बाबा), संदीप पाटील (दादा), संजय पाटील, सर्जेराव कांबळे, आप्पासाहेब पाटील, आनंदराव इंगळे, सुहास पाटील, सागर पाटील यांच्यासह वाळवा तालुका शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम ठेवत पुढील काळातही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.











