सांगली प्रतिनिधी – रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृष्णा नदीतील पाणीपातळी घटल्यामुळे उपसा सिंचनावर बंदी लागू झाली असून शेतीसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाची प्रतीक्षा करत अनेक दिवस शेतकरी थांबले. मात्र, पावसाचा अद्यापही ठोस अंदाज नसल्याने अखेर निसर्गाच्या भरोशावर इंद्रायणी भाताची पेरणी सुरू करण्यात आली आहे. “अजून किती दिवस थांबायचं?” असा सवाल करत शेतकऱ्यांनी शेतीचा जुगार खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
कृष्णाकाठ परिसरातील अनेक शेतांमध्ये भाताची पेरणी पूर्ण झाली असून आता या पिकाला वेळेत पाऊस मिळणे अत्यंत गरजेचे आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास पीक चांगले उभारी घेईल. मात्र पाऊस लांबल्यास उगवण धोक्यात येऊन दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.
सध्या संपूर्ण कृषी क्षेत्राच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, वरुणराजाने लवकरच दमदार हजेरी लावावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.











