सांगली प्रतिनिधी – शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाला आता अधिक धार येत असून, पलूस तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या शक्तिपीठ संघर्ष समितीच्या मोर्चात एका अनोख्या संदेशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चात सहभागी झालेल्या सजवलेल्या बैलाच्या अंगावर ऑइल पेंटने “आमदार-खासदार विकत घेता येतात, पण शेतकरी विकत घेता येत नाही” असा संदेश लिहिण्यात आला होता.
मोर्चाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या बैलगाडीसह शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले. पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि विविध फलकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला.
बैलाच्या अंगावरील संदेश पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. आंदोलनकर्त्यांनी हा संदेश शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत, कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता आपल्या जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका मांडली.
शक्तिपीठ संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात परिसरातील अनेक गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने महामार्गाचा प्रस्ताव मागे घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.












