जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव, वाशिम : 16 जून रोजी कोळी महासंघ, वाशिम यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या बैठकीतील निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच इंग्रज अधिकारी आर. ई. एन्थोव्हन (R.E. Enthoven) यांच्या काळातील कोळी समाजाच्या नोंदी ग्राह्य धरून जिल्ह्यातील सर्व कोळी समाज बांधवांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे रिसोड-मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड. नकुलदादा देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
आंदोलनात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गजानन लाटे, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम भाऊ तहकीक, अमोल भाऊ भुतेकर, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास रामेश्वर बेदरे, गजानन बेदरे, रामेश्वर लोखंडे, बाळकृष्ण गोडघासे, दुर्गादास बेदरे, भागवत खेकाळे, रखमाबाई वानखेडे, मंगलाबाई बेदरे, सुमित्राबाई लोखंडे, बालाबाई गोडघासे, देवानंद गोडघासे यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष विलास रामेश्वर बेदरे यांनी केले.











