ईश्वरपूर प्रतिनिधी – शिराळा तालुक्यासह राज्यभरात धार्मिक तणावाच्या विविध घटना वारंवार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर अंबामाता मंदिर, शिराळा येथे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रगतशील, पुरोगामी, शेतकरी , कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सद्भावना भेट दिली.
याप्रसंगी झालेल्या चर्चेप्रसंगी कॉ. दिग्विजय पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी ‘श्रमिक’चे कॉ. अतुल दिघे, ‘शेकाप’चे भाई भारत पाटील, कॉ. चंद्रकांत यादव, ‘अंनिस’चे प्रा. विजयकुमार जोखे, ‘समाजवादी’चे शिवाजी परुळेकर, महाराष्ट्र संघर्ष समितीचे ॲड. शाकीर तांबोळी, दिगंबर लोहार, ‘विद्रोही’चे शफिक देसाई, प्रा. कादर नायकवडी, रिपब्लिकन सेनेचे दयानंद शिवजातक, संजय साठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना व्यक्त्यांनी समाजात वाढत असलेल्या धार्मिक विद्वेषाबाबत चिंता व्यक्त केली. ‘शिराळापेठा ही सातारा प्रतिसरकारची पायाभरणी करणारी क्रांतिभूमी आहे. या मातीत धार्मिक विखार पेरणे आणि त्यातून तणावाचे प्रसंग वारंवार घडणे अयोग्य आहे. स्थानिक पातळीवर होणारे किरकोळ वाद समन्वय साधून कायद्याच्या चौकटीत तिथेच मिटविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मात्र अशा वादांचे पर्यावसान दोन समुदायांच्या वादात करणे हे समाजाच्या हिताचे नाही. ज्या ठिकाणी सामाजिक सौहार्द आणि शांतता नसते, अशा ठिकाणी प्रगतीला खीळ बसते. अशा धार्मिक दंग्यांमधून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये तरुणांचे करिअर संपुष्टात येते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारांतून हिंदवी स्वराज्य उभे राहिले. संतविचार, स्वराज्य आणि संविधान यामधील समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य ही मुल्यव्यवस्था समान आहे. युवकांनी आणि नागरिकांनी ‘संत- स्वराज्य आणि संविधान’ या त्रिसूत्रीला केंद्रस्थानी ठेवून कार्यरत राहावे’, असे मत व्यक्त्यांनी मांडले.
यावेळी गोपाळ पाटील, सदाशिव खोपडे, डॉ. सुनिल पाटील, अमर पाटील, संपत रुपणे, अविनाश खोत, अनिल सुतार, प्रदिप माने, ॲड. गौस मुजावर, विशाल साठे यांच्यासह विविध समविचारी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवशंभू प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक कैलास देसाई यांनी आभार मानले.










