विशाल क्रांती प्रतिनिधी – (अमर माने मलिकवाड),
मलिकवाड, दूधगंगा नदीवरील मलिकवाड-दत्तवाड धरणावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या सोमवारपासून हा मार्ग सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील दळणवळण अधिक सुलभ होणार असून व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
सुमारे चार कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेला हा प्रकल्प अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात आला आहे.
धरणावरील रस्ता सुरू झाल्यानंतर दोन्ही राज्यांतील व्यापार, कृषी मालाची वाहतूक आणि दैनंदिन प्रवासाला गती मिळणार आहे. त्यामुळे परिसराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या कामाची जबाबदारी कंत्राटदार एस. डी. हामिनी, बेळगाव यांनी यशस्वीपणे पार पाडली. नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या प्रकल्पासाठी विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी श्री.प्रकाशअण्णा हुक्केरी तसेच आमदार श्री.गणेशअण्णा हुक्केरी यांनी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा विकासात्मक प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पूल वाहतुकीसाठी खुला होत असल्याने मलिकवाड, दत्तवाड आणि परिसरातील गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.












