जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव वाशिम : मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील कर्ता पुरुष, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांच्या निधनामुळे गावकऱ्यांचे अश्रू अनावर झाले आहेत.
१३ जून रोजी संतोष तुकाराम बकाल (वय ३८) यांचा मृतदेह गावालगत असलेल्या विद्युत टॉवरच्या खांबाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांच्या पत्नी इंद्रायणी संतोष बकाल (वय ३४), मुलगी जानवी संतोष बकाल (वय ६) आणि मुलगा सोहम संतोष बकाल (वय ४) यांचे मृतदेह मालकीच्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तिवळी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात चौघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
दरम्यान, मयत इंद्रायणी बकाल यांचे भाऊ सुधाकर इंगोले (रा. सिरसाळा) यांनी या संपूर्ण घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मयत संतोष बकाल यांना त्यांच्या सख्ख्या भावाकडून वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. यासंदर्भातील ध्वनीमुद्रण (ऑडिओ रेकॉर्डिंग) उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच, संबंधित वादाबाबत यापूर्वी अनेक वेळा शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्याचेही इंगोले यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करून सत्य समोर आणावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाच्या अनुषंगाने मयताच्या भावासह भावजय यांना चौकशीसाठी शिरपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. वृत्त लिहीपर्यंत या घटनेप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
घटनेबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असला तरी मृत्यूमागील नेमके कारण आणि जबाबदारी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.












