
सांगली प्रतिनिधी – प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकरी व आंदोलनकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक, प्रशासकीय किंवा पोलीस यंत्रणेमार्फत त्रास देऊ नये, तसेच जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांवर पोलीस प्रशासनाने अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. दीपक लाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणारे शेतकरी आपल्या शेती, जमीन आणि उपजीविकेच्या संरक्षणासाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. त्यामुळे या आंदोलनात सहभागी शेतकरी, महिला आणि कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करून प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी.
याशिवाय, सांगली जिल्ह्यात खून, दरोडे, घरफोडी, अवैध धंदे आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलीस प्रशासनाने अशा गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी व आंदोलनकर्त्यांना कोणताही अन्याय किंवा त्रास होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती अॅड. दीपक लाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.











