सांगली प्रतिनिधी – सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या कामांना वेग आला आहे. जमिनीत बऱ्यापैकी ओल निर्माण झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी भुईमूग, सोयाबीन पेरणी तसेच भात टोकणीस प्रारंभ केला आहे.
यावर्षी उन्हाळा कडक असल्याने शेतकरी मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. दोन दिवसांपासून पडलेल्या दमदार पावसामुळे शेतात पेरणीयोग्य वाफसा तयार झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतशिवार गजबजून गेला आहे.
ट्रॅक्टर, बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी, वखरणी भात पेरणी करून शेतकरी मजुरांच्या साह्याने भुईमूग व सोयाबीनची पेरणी करत आहेत. काही ठिकाणी भात खाचरात टोकणीची कामेही सुरू झाली आहेत. वेळेवर पाऊस झाल्याने यंदा खरीप हंगाम चांगला जाईल, अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
पेरणीसाठी बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवरही शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे.









