सांगली प्रतिनिधी – “रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शक्तिपीठ महामार्गाला ताकदीने विरोध करणार,” असा निर्धार माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने विटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
नव्या रेखांकनानुसार शक्तिपीठ महामार्ग कडेगाव, विटा, वाळवा तालुक्यातून जाणार आहे. मात्र या महामार्गाला बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर विटा येथे शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी सरकारवर जोरदार निशाणा साधत शेट्टी म्हणाले, “ज्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे, त्यालाच आमचा विरोध आहे. राज्यातल्या कोणत्याही महामार्गाला आजपर्यंत शेतकऱ्यांनी आणि आम्ही विरोध केला नाही.”
शक्तिपीठ महामार्गामुळे सुपीक जमिनी जातील, शेतकरी देशोधडीला लागेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हा महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.









