
सांगली | प्रतिनिधी
रयत क्रांती कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य व भारतीय बहुजन कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांच्या विविध न्याय्य व प्रलंबित मागण्यांसाठी ३० जुलै २०२६ रोजी सांगली येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. जितेंद्र सूर्यवंशी आणि सलीम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनातील सर्व प्रमुख मागण्या कामगार आयुक्तांनी मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.
सातत्यपूर्ण, शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षामुळे हा विजय मिळाला असून, हा केवळ आंदोलनकर्त्यांचा नव्हे तर संपूर्ण कामगार वर्गाच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनाला सांगली जिल्ह्यातील विविध कामगार संघटना, कामगार प्रतिनिधी, सामाजिक संस्था तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा पाठिंबा लाभला. अनेक कामगारांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आंदोलनात सहभागी होत संघर्षाला बळ दिले.
या लढ्याला आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, खासदार धैर्यशीलजी माने, सागरभाऊ खोत, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष आकाश दादा माने, छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे, अनुप वाडेकर, गणेश दादा शेवाळे (बळीराजा), बादशाह इनामदार तसेच अनेक मान्यवरांनी मोलाचे सहकार्य व पाठिंबा दिला. त्यांच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळे आंदोलन यशस्वीरीत्या मार्गी लागण्यास मदत झाली.
आंदोलन यशस्वी झाल्यानंतर कामगार प्रतिनिधींनी सर्व कामगार संघटना, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि संघर्षात सहभागी झालेल्या सर्व कामगारांचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वांनी असेच सहकार्य कायम ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
“हा विजय एका व्यक्तीचा नसून संपूर्ण कामगार वर्गाच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय आहे.” ✊🚩











