इचलकरंजी, प्रतिनिधी : इचलकरंजी–यड्राव–कोंडीग्रे प्रमुख जिल्हा मार्गावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमणाचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग, हातकणंगले यांच्या पुढाकारातून मार्गी लावण्यात आला आहे. या कारवाईमुळे यड्राव चौक परिसरातील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने शरद पॉलिटेक्निक कॉलेज परिसरापासून पार्वती इंडस्ट्रीजपर्यंत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. रस्त्यालगत असलेली सुमारे १० ते १२ फूट अंतरातील अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली.
सदर कारवाई कोणताही दबाव न आणता, संबंधितांशी सहानुभूतीपूर्वक व मैत्रीपूर्ण पद्धतीने संवाद साधून करण्यात आली. त्यामुळे कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन कुंभार यांच्या आदेशानुसार शाखा अभियंता विनोद मस्के, आमिन रमदान तसेच विभागातील इतर कर्मचारी यांनी ही मोहीम राबविली. कारवाईदरम्यान शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही उपस्थित होते.
यड्राव चौकातील अतिक्रमणांमुळे वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली असून भविष्यात रस्ता अधिक मोकळा व सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. नागरिकांनीही या मोहिमेला सहकार्य दर्शविल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.