
मुंबई वृत्तसेवा : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या किनारपट्टी भागांसह गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई व ठाण्यात मुसळधार पावसासह ताशी ५० ते ६० किमी, तर झोतदार वाऱ्यांचा वेग ७० किमी प्रतितासपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे सखल भागांत पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि झाडांच्या फांद्या तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोकणाबरोबरच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सक्रिय मान्सून, कमी दाबाचा पट्टा आणि अनुकूल मान्सून द्रोणीमुळे ३० जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहू शकतो.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले व ओढ्यांपासून दूर राहावे, वीज कडाडत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच किनारपट्टी भागातील मच्छीमारांनी अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.










