ढेंकनाल : लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणारी एसयूव्ही कार रस्त्यावरील वळणावरून नियंत्रण सुटल्याने तलावात कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण सुखरूप बचावले. अंधारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दुर्घटनेमुळे बांगुरसिंग आणि इंदूपूर या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगुरसिंग गावातील अभिषेक साहू याचा विवाह इंदूपूर गावातील रोहित कुमार पृष्टी यांच्या मुलीशी होणार होता. विवाहासाठी पाहुण्यांना घेऊन अनेक वाहने वधूच्या गावाकडे निघाली होती. याच वऱ्हाडातील एक एसयूव्ही रस्त्यावरील वळणावर आली असता अंधारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट तलावात कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर एसयूव्ही तलावातून बाहेर काढण्यात आली. मात्र, तोपर्यंत कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला होता. दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले.
या दुर्घटनेत राम साहू (२५), अविनाश साहू (२६), राकेश कुमार साहू (२५), चंद्रकांत स्वाइन (२७) आणि अभिजीत साहू यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, ढेंकनाल सदर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा मुख्यालयातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.










