सांगली प्रतिनिधी – वारणा चांदोली खोऱ्यात व पाथरपुंज येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.आज गुरुवारी (23 जुलै) सकाळी 6 वाजेपर्यंत धरण 75.13 टक्के भरले असून, एकूण पाणीसाठा 25.84 टीएमसी इतका झाला आहे.
धरणाची पाणीपातळी 617.30 मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, उपयुक्त पाणीसाठा 18.96 टीएमसी (68.91 टक्के) आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा उपयुक्त साठा 20.92 टीएमसी (76.03 टक्के) होता.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे गेल्या 24 तासांत 181 मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. त्यामुळे हंगामातील एकूण पावसाची नोंद 3019 मिमीवर पोहोचली आहे. धरण परिसरातही 78 मिमी पाऊस झाला असून, तेथील हंगामी पाऊस 1169 मिमी इतका झाला आहे.
मुसळधार पावसामुळे सध्या धरणात 15,275 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या 24 तासांत धरणात 37.37 एमसीएम पाणी जमा झाले असून, पाणीसाठ्यात 1.32 टीएमसीची वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत धरणातील साठ्यात 14.64 टीएमसीची वाढ नोंदविण्यात आली आहे.
धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने स्पिलवे, पीडब्ल्यूएच आणि कालवा या तिन्ही मार्गांवरील विसर्ग सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आणि प्रशासनाने पाणलोट क्षेत्रात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.










