

मांगले : वारणा नदीवरील मांगले–सावर्डे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील बर्गे वेळेत काढण्यात जलसंपदा विभागाने तत्परता दाखवली असती, तर मोठे नुकसान टळले असते. या घटनेची सखोल चौकशी करून कर्तव्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार सत्यजित देशमुख यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे वारणा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने मांगले–सावर्डे बंधाऱ्यावरील रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. या नुकसानीची आमदार देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, जलसंपदा विभागाने बंधाऱ्यावरील बर्गे वेळेत काढण्याबाबत आवश्यक ती दक्षता घेतली असती, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसह संरक्षण भिंत उभारण्यासाठी शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून घेण्यात येईल. त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. धनटेक पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफॉर्मरचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनामार्फत तातडीने नवीन जोडणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले असून तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांचे तांत्रिक ऑडिट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या पाहणी दौऱ्यात कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, जिल्हा परिषद सदस्य साईतेजस्वी देशमुख, उपविभागीय अभियंता बी. आर. पाटील, कोडोली पाटबंधारे शाखेच्या अभियंता नेहा देसाई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सरपंच प्रल्हाद पाटील, वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील, वारणा बँकेचे संचालक अभिजित पाटील, फेडरेशन संचालक धनाजी नरुटे, माजी सरपंच उत्तम गावडे, माजी सभापती मायावती कांबळे, सत्यम पाटील, सुभाष पाटील, बाबा पाटील, बबन दशवंत, संतोष उत्तरकर, भिमराव गराडे, विश्वनाथ पाटील, नथुराम चरापले, सुरेश पाटील यांच्यासह अधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











