सांगली वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुंबई आझाद मैदान या ठिकाणी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. सांगलीमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व माध्यमाच्या जवळजवळ २४ शिक्षक संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शिक्षक सामूहिक रजा काढून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
२०१० पूर्वी पासून कार्यरत असणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट देण्यात यावी नसेल तर तामिळनाडू, उत्तर प्रदेश व तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कार्यरत शिक्षकांची स्वतंत्र परीक्षा घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीसाठी टीईटी पात्रता धारण करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे या निर्णयाच्या अधीन राहून कार्यरत असणाऱ्या सेवाज्येष्ठ शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करावी व सेवाज्येष्ठतेने पदोन्नती प्रक्रिया राबवून न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून सदर पदोन्नती घेतलेल्या शिक्षकांना ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत टीईटी पास करण्याची मुदत देण्यात यावी, शासन आदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे काम अशैक्षणिक ठरवण्यात आले असून त्या शासन आदेशानुसार शिक्षकांना सदर कामातून कायमस्वरूपी मुक्त करण्यात यावे अशा महत्त्वाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र येऊन जवळजवळ ४००० शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालया समोर सर्व संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
ही आंदोलनाची पहिली पायरी असून शासन स्तरावरून या मागणीचा विचार करून शिक्षकांना फक्त शिकवू द्या अशा पद्धतीची मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी मनोगतातून केली. स्वागत प्रास्ताविक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी केले. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी आंदोलनाला भेट देऊन शासन शिक्षकांच्या विरोधात काम करत असून मराठी शाळा बंद पाडण्याचे काम करत असल्याची स्पष्ट भूमिका मांडली व शिक्षकांना कोणतेही अतिरिक्त काम न देता फक्त शिकवण्याचे काम दिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायकारक धोरणा विरोधात वाचा फोडली, जिल्हाध्यक्ष शशिकांत बजबळे यांनी टीईटी शिक्षकांना का नको याविषयी आपले मत मांडले. प्रहारचे अध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर यांनी आंदोलनात शिक्षक प्रश्न म्हणजे समाजाचे प्रश्नच असल्याचे आवर्जून सांगितले.जुन्या पेन्शनचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी १९८२ ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यांवर भूमिका मांडली. शिक्षक परिषदेचे राजेंद्र नागरगोजे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नावर भूमिका मांडली..प्राथमिक शिक्षक संघाचे माधवराव पाटील, धैर्यशील पाटील, शिक्षक परिषदेचे शशिकांत पाटील, प्रहार संघटनेचे चंद्रशेखर क्षीरसागर, माध्यमिक शिक्षक भारतीचे सुधाकर माने, मुख्याध्यापक संघाचे संतोष नाईक,कास्ट्राईब संघटनेचे परशुराम जाधव, बापू दाभाडे, सागर खाडे, सुनिता चौगुले,करुणा मोहिते, अर्चना कोळेकर, अंजली कमाने यांच्यासह विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव वारे यांनी केले.
धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना संघटना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी महोदयांनी प्रश्न समजावून घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत शासन स्तरावर निवेदन पाठवण्या संदर्भात आश्वासित केले.
यावेळी महेश शरनाथे, अमोल माने, शशिकांत बजबळे, राजेंद्र नागरगोजे, अमोल शिंदे, सयाजी पाटील, धैर्यशील पाटील, माधवराव पाटील, मुकुंद सूर्यवंशी, परशुराम जाधव, शशिकांत पाटील, चंद्रशेखर क्षीरसागर, संतोष काटे, मुरलीधर दोडके, उत्तम इंगळे, बाबासाहेब जानकर, राजेंद्र कांबळे, मनोहर साबळे, डॉ. संतोष कदम, भानुदास चव्हाण, रमेश पेटकर, जकी पटेल, अन्सार तांबोळी, अजय राक्षे, दिवाणजी देशमुख हे सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष तसेच म शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.











