सांगली प्रतिनिधी – चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वारणा नदीवर दिसून येत असून नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पुलावर पाणी आल्याने पुलावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे.
पुलावरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. परिणामी, या मार्गावरील वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
प्रशासनाने नागरिकांना पूल ओलांडण्याचा किंवा पुराच्या पाण्यातून जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, पोलीस आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.











