शिराळा, प्रतिनिधी : पाचंब्री.पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या बांबवडे, पाडळवाडी, ओंडी, पाचंब्री चला, गिरजवडे, करमाळे, खेड, बेलदारवाडी. रेड. दृंदवाडी., पाडळी आदी गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, जीर्ण झालेल्या वीज यंत्रणा तसेच धोकादायक अवस्थेतील डीपी व वीज खांबांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांकडे लक्ष वेधत पंचायत समिती सदस्या सो.सविता विजय महाडिक यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यां. श्री. हेमंत येडगे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, अनेक ठिकाणी डीपीवरील पेट्या, फ्यूज व इतर साहित्य खराब अवस्थेत असून पावसाळ्यात शॉर्टसर्किट, फ्यूज उडणे, पोल कोसळणे आणि मोठे दुर्घटनांचे धोके निर्माण होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी वीज खांब गंजलेल्या व धोकादायक स्थितीत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची तातडीने दुरुस्ती अथवा बदली करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडिततेमुळे शेतकरी, घरगुती ग्राहक तसेच व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत असून शेती उत्पादन आणि दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध सौर ऊर्जा योजनांची माहिती व स्मार्ट मीटर. संदर्भात येणाऱ्या अडचणी. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावागावांत जनजागृती व विशेष शिबिरांचे आयोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक व प्राधान्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्या. सविता महाडिक यांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.











