
ईश्वरपूर प्रतिनिधी – शक्तिपीठ महामार्गामुळे सुपीक बागायती शेतजमिनींचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा करत महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी वाळवा तालुका शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आज (शनिवार, दि. २७ जून) रात्री ८ वाजता शासकीय विश्रामगृह, इस्लामपूर येथे महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना अद्याप एकाही लोकप्रतिनिधीने शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा मुद्दा प्रभावीपणे विधिमंडळात उपस्थित केला नसल्याची नाराजी समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
बैठकीत मुंबईतील आझाद मैदान येथे पावसाळी अधिवेशनादरम्यान एकदिवसीय आंदोलन करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार असून, आंदोलनाची रूपरेषा आणि पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, सुपीक बागायती शेतजमिनी वाचवाव्यात आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी वाळवा तालुक्यातील शेतकरी, भूमिपुत्र, युवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन वाळवा तालुका शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केले आहे.











