
जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव, वाशिम : दि. 22 जून कारंजा शहरातील एका खून प्रकरणातील फरार आरोपीस तात्काळ अटक करून पीडित कुटुंबास न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित कुटुंबीयांनी कारंजा पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
माहितीनुसार, दिनांक 17 मे रोजी घडलेल्या खून प्रकरणात कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एका आरोपीस अटक करण्यात आली असली तरी इतर काही आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात असूनही उर्वरित आरोपींचा शोध लागलेला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी घरातील महिला व तिची मुलगी झोपेत असताना अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा वाजविल्याची घटना घडली. या प्रकारामुळे कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून फरार आरोपींकडून त्रास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात मराठी न्यूजचे प्रतिनिधी किशन काळे यांनी कारंजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती घेतली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, घटनेस एक महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही संबंधित आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने पीडित कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. फरार आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व पीडित कुटुंबास न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.











